
“छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असह्य; नगरसेवक शैलेश पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने जनआंदोलन – ॲड. रोहिदास मुंडे”
दिवा:- दिवा विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या स्थापनेसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी मिंध्ये गटाचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व दिवा विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा लवकरात लवकर उभारण्यासाठी महासभेत विषय मांडू, असे आश्वासन दिले.
मात्र, या संवादादरम्यान नगरसेवक शैलेश पाटील यांनी “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असा सन्मानपूर्वक उल्लेख करण्याऐवजी “शिवाजी चौक” असा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सातत्याने राजकारण केले जाते, त्यांच्याच नावाचा सार्वजनिकरीत्या असा अनादर करणे हे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे.
तीन वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचा उल्लेख होणे ही गंभीर बाब असून त्यामुळे दिवा विभागातील शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख तथा ॲड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र निषेध व्यक्त करत नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा विभागातील तमाम शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, त्यांनी इशारा दिला की, जर नगरसेवक शैलेश पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली नाही, तर दिवा विभागातील सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन त्यांच्या विरोधात शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींची राहील, असेही ॲड. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले.








