
- 🚨 द टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज| दिवा
दिवा पोलीस चौकीत सामंजस्य; फेक बातम्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
दिवा | प्रतिनिधी : दिवा पोलीस चौकी येथे पत्रकार आणि सुशील पांडे यांच्यात निर्माण झालेल्या गैरसमजुतीच्या प्रकरणावर परस्पर चर्चेतून सामंजस्याने तोडगा निघाला असून, दोन्ही बाजूंनी या विषयाला पूर्णविराम देण्यात आला.
या चर्चेदरम्यान बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची संपूर्ण शहानिशा करणे ही प्रत्येक पत्रकाराची नैतिक व व्यावसायिक जबाबदारी आहे, यावर विशेष भर देण्यात आला. अपूर्ण, एकतर्फी किंवा अप्रमाणित माहितीच्या आधारे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे संबंधित व्यक्तींची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच समाजात गैरसमज पसरू शकतात. त्यामुळे कोणतीही माहिती सत्यता पडताळल्याशिवाय प्रसिद्ध करू नये, असे आवाहन करण्यात आले.
तसेच सोशल मीडियावर फेक बातम्या, अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक प्रसारित करणाऱ्यांविरोधात आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पत्रकारितेचा खरा पाया म्हणजे सत्य, अचूकता आणि जबाबदारी. जबाबदार पत्रकारिता समाजात विश्वास निर्माण करते, तर अप्रमाणित माहिती समाजात गोंधळ निर्माण करते. त्यामुळे पत्रकारांसह नागरिकांनीही कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले.








