
⭕अखेर दिव्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठीचे उपोषण मागे
नगरसेवक शैलेश पाटील यांचे लेखी आश्वासन
विकास इंगळे- प्रतिनिधी
ठाणे ता ३ : दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच पुतळ्याच्या उभारणीसंदर्भातील ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत तातडीने मांडून मंजूर करावा या मागणीसाठी समाजसेविका सुवर्णा कांबळे आणि समाजसेवक सौरव अडागळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी सांगता झाली. शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, तसेच पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शैलेश पाटील यांनी सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांना नारळपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पुतळ्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला सध्या तरी सकारात्मक दिशा मिळाली असून आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे दिवेकरांचे लक्ष लागले आहे.
आंबेडकरी चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ नेते एकनाथ भगत (बाबा) यांच्या सामाजिक आणि चळवळीतील योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्यासाठीही प्रयत्न केले जातीलअशी ग्वाही देण्यात आली. प्रसंगी अजित भगत, भालचंद्र भगत, विश्वास भालेराव, बालाजी कदम, गंगाधर गायकवाड, रवी कदम, सुनील कांबळे, प्रवीण उतेकर, सरला गायकर, शिला बहिरूने यांच्यासह शिवसैनिक व आंबेडकरी चळवळीचे असंख्य अनुयायी उपस्थित होते. प्रसंगी समाजसेवक सौरव अडागळे व सुवर्णा कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आंबेडकरी संघटना, महिला मंडळे, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दिवा शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.








